परळी वैजनाथ (बीड) : वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याशी करार केलेले ऊसतोड कामगार, वाहतूक ठेकेदार यांना २८ जून रोजी एका कार्यक्रमात गळीत हंगाम २०१७-१८साठी पहिल्या हप्त्याचे धनादेश वाटप करण्यात आले.
‘या वर्षीच्या गळीत हंगामात वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना पाच लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करणार आहे. यासाठी ऊसतोड मजूर, वाहतूक ठेकेदार आणि सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी सहकार्य करावे,’ असे आवाहन आमदार पंकजा मुंडे यांनी केले. त्या पुढे म्हणाल्या, ‘वैद्यनाथला येत्या काही वर्षांत गतवैभव प्राप्त करून आशिया खंडात पहिल्या क्रमांकावर आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी ऊस उत्पादक शेतकरी, ऊसतोड मजूर, वाहतूक ठेकेदार, अधिकारी, कर्मचारी यांनी सहकार्य करावे. गोपीनाथराव मुंडे यांनी शेतकरी, शेतमजूर यांच्या हितासाठी हा
कारखाना उभा केला आहे. गत वर्षी कारखाना बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागला. एक वर्षाचा हा काळ अतिशय वेदनादायी होता. या वर्षी कारखाना पूर्ण क्षमतेने चालवून सहा लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट व्यवस्थापनाने ठरवले आहे. यासाठी परिसरासह बाहेरच्या जिल्ह्यातूनही ऊस आणला जाणार आहे. कारखाना ही कामधेनू आहे. तिला जपण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे.’
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारखन्याचे संचालक आमदार आर. टी. देशमुख होते. या वेळी कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेवराव अघाव, संचालक ज्ञानोबा मुंडे, पांडुरंगराव फड, माधवराव मुंडे, कार्यकारी संचालक व्ही. जी. दगडे आदींसह सर्व संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी व ऊसतोड मजूर, वाहतूक ठेकेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.